संपादकीय : वृत्तपत्रांचे लोकशाहीतील स्थान लक्षात घेता वृत्तपत्रांना पुरेसे स्वातंत्र्य असणे आवश्यक असते. मात्र हे स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही. कायद्याच्या माध्यमातून वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण व नियंत्रण केले जाते. या कायद्यांना एकत्रितपणे ‘वृत्तपत्रविषयक कायदे’ म्हटले जाते.वृत्तपत्रविषयक कायदे तीन प्रकारचे असतात : (१) वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणारे, (२) वृत्तपत्रस्वातंत्र्यावर बंधन घालणारे आणि (३) वृत्तपत्र व्यवसायाची ‘धंदा’ ही बाजू नियंत्रित करणारे. यांपैकी पहिल्या व दुसऱ्या प्रकारांतील कायदे केवळ वृत्तपत्रांसाठी बनविलेले नसून अन्य व्यक्ती व माध्यमे यांनाही ते लागू होतात. मात्र तिसऱ्या प्रकारातील कायदे खास वृत्तपत्रांसाठीच बनविण्यात आले आहेत.
वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणारे कायदे :
भारतीय संविधानाच्या कलम १९(२) नुसार भाषण स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालता येतात. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, राष्ट्राची सुरक्षितता,सद्भिरुची, नैतिकता, न्यायालयाचा अवमान, बदनामी किंवा गुन्हा करण्यास प्रोत्साहन देणे या संदर्भातच कायदे मंडळांना स्वातंत्र्यावर वाजवी बंधन घालता येते. घातलेले बंधन वाजवी आहे का अवाजवी आहे, हे न्यायालये ठरवतात.